Success Story : एकाच प्रकारचे पीक घेतल्यामुळे बाजारात शेतमालाची मोठी आवक होते आणि त्यामुळे भाव कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होते, हे एक नेहमीचेच चित्र आहे. परंतु, बाजारपेठेचा अभ्यास करून आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत खेड तालुक्यातील चिंबळी येथील शेतकरी सीमा जाधव यांनी आपल्या वीस गुंठे शेतात एक यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी करटुलीच्या शेतात शोभेच्या सूर्यफुलांचे आंतरपीक घेऊन केवळ १५ दिवसांत तब्बल एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी एकाच प्रकारचे पीक घेत असल्यामुळे आणि ते एकाच वेळी बाजारात येत असल्यामुळे शेतमालाच्या किमती मोठ्या प्रमाणात पडतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत, मिश्र शेती किंवा मुख्य पिकांमध्ये आंतरपीक घेणे ही काळाची गरज बनली आहे. कृषी अभ्यासकही शेतकऱ्यांना याच प्रकारचा सल्ला देतात.Success Story
याच सल्ल्यानुसार, चिंबळी गावच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या आदर्श शेतकरी सीमा जाधव यांनी आपल्या २० गुंठे करटुलीच्या शेतात आंतरपीक म्हणून शोभेच्या सूर्यफुलांची लागवड केली. ही फुले टिकाऊ, देखणी आणि मजबूत असल्यामुळे पितृपक्ष वगळता शहरी बाजारात त्यांना वर्षभर चांगला भाव मिळतो, असे सीमा जाधव यांनी सांगितले.Success Story
जाधव यांनी आपल्या शेतात सुमारे ५००० बियाणे लावले, ज्यामुळे प्रत्येक झाडाला एकच आकर्षक फूल आले. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवादरम्यान, या फुलांच्या ५ फुलांच्या बंचला सरासरी २०० रुपये भाव मिळाला. या आंतरपिकातून केवळ पंधरा दिवसांत जाधव यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
सीमा जाधव यांच्या या यशस्वी प्रयोगातून इतर शेतकऱ्यांनाही योग्य नियोजनाची आणि मिश्र शेतीची प्रेरणा मिळू शकते. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, बाजारपेठेचा अभ्यास करून वेगळ्या पिकांची निवड केल्यास शेतीतही चांगला नफा मिळवता येतो, हे जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे.Success Story